40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home गुन्हेवार्ता दोन मुलींचा अपहरणाचा डाव फसला मात्र आरोपी फरार

दोन मुलींचा अपहरणाचा डाव फसला मात्र आरोपी फरार

0
46

blank

अर्जुनी मोरगाव -तालुक्यातील सावरटोला व उमरी या दोन गावात २८ व २९ जुलै रोजी मिनीडोर तसेच चारचाकी वाहनाने मास्क घालून आलेल्या काही अनोळखी युवकांनी दोन अल्पवयीन मुलींचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही मुलींना आरडाओरड केल्याने अपहरणाचा डाव फसला. परंतु, आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाले. या दोन्ही घटनांमुळे नवेगावबांध, सावरटोला, उमरी, बोरटोला, मुंगलीटोली, बिडटोला यासह अर्जुनी मोरगाव तालुक्यात चांगलीच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मुलींचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे  पोलिस या प्रकरणाला कसे हाताळतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सविस्तर असे की, उमरी येथील वर्ग सातवीमध्ये शिकत असलेली मुलगी २८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता सुमारास शाळेतून बोरटोला येथील किराणा दुकानातून सामान घेवून घरी जात होती. दरम्यान उमरी गावाच्या वळणावर एक मिनीडोर (टाटाएस थांबली) त्यातून मास्क घातलेले इसम उतरले. आणि त्या मुलीला बळजबरीने वाहनात डांबण्याचा प्रयत्न केला. त्यातच एक दुचाकीस्वार अचानक आल्याने त्यांचा डाव फसला आणि त्यांनी वाहनासह बाक्टीच्या दिशेने पळ काढला. लगेच दुसर्‍या दिवशी २९ जुलै रोजी उमरी ते बोरटोला मार्गावर सातव्या वर्गात शिकत असलेली एक मुलगी दुधाची कॅटली घेवून डेअरीवरून सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास घरी परत येत होती.

त्यातच पांढर्‍या रंगाचे चारचाकी वाहन थांबले आणि त्या मुलीला बळजबरीने वाहनात डांबण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीने देखील आरडाओरड केल्याने शेतशिवारात काम करीत असलेले मुलीचे वडिल, काका हे धावून आल्याने हा डाव देखील फसला आणि चारचाकी वाहनाने आलेले ते आरोपी पळाले. सतत दोन घटनांमुळे नवेगावबांध, सावरटोला, उमरी, बोरटोला, मुंगलीटोली, बिडटोला यासह अर्जुनी मोरगाव तालुक्यात चांगलीच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून मुली व लहान बालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिस प्रशासन या प्रकरणाला घेवून कोणती भुमिका घेतात? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या दोन्ही घटनांबाबत नवेगावबांध पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष केंद्रीत करून मुला-मुलींना सुरक्षित व सुव्यवस्थितपणे ये-जा करण्याची खात्री करून घ्यावी.
– संदिप तरोणे, पोलिस पाटील