बीड -जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला नवीन वळण आलं आहे. या प्रकरणात सीआयडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी संध्या सोनवणे यांची चौकशी केली आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.
संध्या सोनवणे यांची चौकशी-
सीआयडीने संध्या सोनवणे यांची चौकशी का केली? याचं कारण समोर आलेले नाही. मात्र, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या चौकशीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक अँगलने तपास सुरू असून, सीआयडी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, खंडणी आणि अपहरण-हत्या या प्रकरणाच्या अँगलने तपास करत आहे.
सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांची दुसऱ्यांदा चौकशी केली आहे, त्याचबरोबर संध्या सोनावणे यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. संध्या सोनावणे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत आणि त्यांच्या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे पोलीस अध्यक्षकांची बदली करण्यात आली होती. आता संध्या सोनावणे यांची चौकशी होण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. संध्या सोनवणे यांची वाल्मिक कराडसोबत काही संबंध आहेत का?, यासोबत अणखी काही प्रश्न यावेळी विचारण्यात येत आहेत.
सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकं तयार केली आहेत. अनेकांचे कॉल रेकॉर्ड काढण्यास सुरुवात केली आहे आणि वाल्मिक कराड यांचे दोन्ही अंगरक्षकांचे मोबाईल फोन फॉरेन्सीक तपासणीसाठी जप्त केले आहेत. फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.