नागपूर : दीड वर्षांपूर्वी भारतीय रिझर्व बँकेने चलनातून बाद केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा मजुरांच्या माध्यमातून बदलवून घेणारे मोठे रॅकेट पोलिसांनी उघड केले असून त्याचे ‘कनेक्शन’ थेट दिल्ली, गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यांशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. मजुरांकडून लाखोंच्या नोटा बदलवून त्यांना काही रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून काम करून घेतल्या जात होते. यामागे व्यापाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याचे समजते.
सदर पोलिसांनी दलाल नंदलाल मोर्या (३५) रा. सीताबर्डी, रोहित बावणे (३४) रा. शांतीनगर, किशोर बोहरीया (५४) रा. झिंगाबाई टाकळी आणि व्यापारी अनिलकुमार जैन (५६) रा. जबलपूर-मध्यप्रदेश यांना अटक केली आहे. नोटा बदलून घेणाऱ्या टोळीचा म्होरक्या अनिलकुमार जैन असून त्याने आतापर्यंत कोट्यवधीच्या नोटा बदलवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या दीड वर्षांपूर्वी २ हजार रुपयांच्या नोट चलनातून बाद करण्यात आल्या. मात्र, ज्यांच्याकडे अजूनही नोटा आहेत, त्यांनी आरबीआयमध्ये आपला पत्ता, आधारकार्ड देऊन नोटा बदलवून देण्यात येतात. मात्र, त्यासाठी २० हजार रुपये अशी मर्यादा घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात नागपूर, बेलापूर आणि मुंबई या तीन ठिकाणी नोटा बदलून घेण्यात येते. रिझर्व्ह बँकेत विशेष काऊंटर आहे. मुख्य आरोपी अनिलकुमार जैन हा दिल्ली आणि उत्तरप्रदेशातून २ हजारांच्या चलनी नोटा आणतो. त्या बदलण्यासाठी त्याने नागपुरातील नंदलाल मोर्या, रोहित बावणे आणि किशोर बहोरीया यांना हाताशी धरले. बहोरिया हा झोपडपट्टीबहुल वस्त्यात जाऊन महिलांना गोळा करीत होता. त्या महिलांना ३०० रुपये मजुरी देऊन आरबीआयमधून नोटा बदलविण्यास सांगत होता.