राज्यात क्षयरोगाने नऊ महिन्यांत सहा हजार मृत्यू

0
9

नागपूर – राज्यातील क्षयरोगाच्या जंतूंचा प्रादुर्भाव जोमाने वाढला असून, गेल्या नऊ महिन्यांत 5 हजार 886 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी विधान परिषदेत लेखी प्रश्‍नाला उत्तर देताना दिली.

याबाबत विजय गिरकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात दहा हजारांपेक्षा अधिक महिलांना क्षयरोग झाल्याचे निदर्शनात आले आहे. त्यातील 5 हजार 886 जणांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला असला तरी ही आकडेवारी पाहता क्षयरोगाचा प्रादुर्भाव जोमाने आढळून येत नसल्याचे स्पष्ट केले.

राज्यात क्षयरोग नियंत्रण करण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सर्व जिल्ह्यात व महानगरपालिकेत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत क्षय रुग्णांची तपासणी करण्यासाठी 1471 सूक्ष्मदर्शी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात 33 जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रे व 416 क्षयरोग निवारण पथके स्थापन करण्यात आली आहेत. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सरकारच्या निधी व्यतिरिक्त 2013-14 मध्ये 51 कोटी 92 लाखांचा निधी खर्च करण्याच आला. चालूवर्षी 75 हजार 56 कोटींचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे, असे सावंत म्हणाले.