17 सप्टेंबरला नागपूर येथे ‘इंडस्ट्री मिट’चे आयोजन

0
3

गोंदिया,दि.23 : महाराष्ट्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हे अधिक प्रभावी माध्यम आहे. सदर रोजगार मेळाव्यात उद्योजक व नोकरी इच्छुक उमेदवारांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांकडील रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित करुन तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होणे गरजेचे आहे.

          राज्यातील बेरोजगारांना अधिक रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 16 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचे उपस्थितीत नामांकीत 44 इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज समवेत, 20 एप्रिल 2023 रोजी मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, अपर मुख्य सचिव, आयुक्त यांचे उपस्थितीत 16 उद्योजक व प्लेसमेंट एजन्सीज समवेत 1 लाख 35 हजार नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. 15 जुलै 2023 रोजी काशिनाथ घाणेकर सभागृह ठाणे येथे इंडस्ट्री मिट हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये 289 उद्योजकांसोबत 2 लाख नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार झाला तसेच 9 जून 2023 रोजी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, बाणेर रोड, पुणे येथे इंडस्ट्री मिट हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये 141 उद्योजकांसोबत 1 लाखाच्या वर नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार झाला.

        सदर सामंजस्य करारनामे करण्यात आलेले उद्योजक Manufacturing, Media and entertainment, Automobile, Food, Home Appliance, Security, Retail, Insurance, Real Estate, Fire Safety, BPO, KPO, Cash Management, Corporate placement, Staffing Company, Staffing services, Placement Agency इत्यादी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देत आहेत.

        या विभागामार्फत मागील वर्षापर्यंत साधारणत: 200 मेळावे आयोजन करण्यात येत होते. परंतु जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सन 2022-23 पासून 600 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सन 2022-23 अखेर पर्यंत आयुक्तालयामार्फत विविध योजना व 557 रोजगार मेळाव्याद्वारे 2 लाख 83 हजार उमेदवारांची नोकरीसाठी निवड झालेली आहे.

        वरील दोन्ही दिवशी केलेले सामंजस्य करार हे मुख्यत: मुंबई व मुंबई नजिकच्या जिल्ह्यातील असून राज्यातील उर्वरित विभागातील उमेदवारांना सुध्दा रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने उदा. विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या विभागात अश्याच पध्दतीने इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज इत्यादी समवेत सामंजस्य करारनामा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

         ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून नागपूर विभागातील नामांकीत इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार इत्यादी समवेत सामंजस्य करार करण्याकरीता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 17 सप्टेंबर 2023 रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग मैदान, नागपूर येथे ‘इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रम मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, प्रधान सचिव व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील विविध उद्योजकांना आवश्यक ते कुशल/ अकुशल मनुष्यबळ विनामूल्य प्राप्त होणे, उद्योग/ आस्थापनांकरीता मनुष्यबळाच्या मागणीबाबत जाहिरात प्रसिध्द करणे, उद्योजकांना रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवून देणे, उमेदवारांना रोजगार प्राप्त करणे सोईचे होणे तसेच शासन आणि उद्योग समुह यांच्यात सामंजस्य/ समन्वय साधणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतु आहे.

       गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच इंडस्ट्रीजना आवश्यक कुशल/ अकुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरीता नागपूर विभागातील सर्व नामांकीत उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज, मोठमोठे हॉटेल्स व हॉस्पीटल्स, मॉल्स, सिक्युरिटी एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित ‘इंडस्ट्री ‍मिट’ कार्यक्रमामध्ये सहभागी शासनासोबत जास्तीत जास्त संख्येने सामंजस्य करार करुन घ्यावे व आलेल्या संधीचा लाभ घ्यावा. तसेच रोजगार मेळाव्यात उद्योजकांनी उपस्थित राहून आपल्याकडील रिक्त पदे उपलब्ध करुन द्यावी व बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत सहकार्य करावे. असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 07182-299150 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा 9960797276 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.