मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी काम करणार-ना.बडोले

0
17

गोंदिया- गेल्या ६५ वर्षांपासून राज्यातील मागास असलेल्या दलित ,बौद्ध,बहुजन समाजाच्या विकास काँग्रेसप्रणीत सरकारने रोखून धरला. यामुळे आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेला विकसित समाज घडू शकला नाही. त्या मागास समाजाच्या विकासासाठीच नव्हे तर उत्थानासाठी आपण आपल्या मंत्रिपदाचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री इंजी.राजकुमार बडोले यांनी केले. ते गोंदिया येथे पहिल्यादांच मंत्री झाल्यानंतर जिल्हा आगमनप्रसंगी आयोजित भारतीय जनता पक्षाच्या सत्कार कार्यक्रमात रविवारी बोलत होते.
अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले हे होते. कार्यक्रमाला सत्कारमुर्ती ना.राजकुमार बडोले, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, बाळा काशीवार,एड.रामचंद्र अवसारे,माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे,हेमंत पटले,केशव मानकर,नेतराम कटरे,मदन पटले,मोरेश्वर कटरे,सीता रहागंडाले,कुसन घासले,प्रकाश गहाने,अशोक इंगळे,नगराध्यक्ष कशीश जायस्वाल आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना.बडोले म्हणाले की गेल्या १५ वर्षांनतर जिल्ह्याला मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा लाभ कसा देता येईल, याचे प्रयत्न राहणार असून रखडलेले सिंचन प्रकल्प, वनजमिनीचे पट्टे, प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना आपण प्राधान्य देणार आहोत. राज्यात अनेक सामाजिक न्याय मंत्री होऊन गेले. परंतु, त्यांनी मागासवर्गींयांच्या समस्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ओबीसीसंह बहुजन दलित बौद्ध समाजाचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे त्याकडे प्राधान्य देऊन या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी लवकरच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱया मान्यवरांची आपण बैठक बोलावणार असल्याचे म्हणाले.
यावेळी बोलताना खासदार नाना पटोले यानी ना.बडोेलेंच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळालेले मंत्रिपद अभिमानाची गोष्ट असून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या जिल्ह्यात राहिलेल्या पालकमंत्र्याची वेळ आता राहिलेली नसून जिल्ह्यातलाच मंत्री आपला पालकमंत्री होणार असल्याने विकासाच्या नव्या युगाला सुरवात होणार आहे. पक्षाच्या धोरणाला लक्षात ठेवूनच काम करावयाचे असून गोंदियाच्या पराभवाचे दुःखही आहे.भविष्यात ही जागा सुध्दा आपण जिंकू आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाला भरघोष यश मिळवून देण्यासाठी आजपासूनच सक्रिय होण्याचे आवाहन केले. संचालन महामंत्री वीरेंद्र अंजनकर यांनी केले.