एव्हरेस्टवीर विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख

0
11

चंद्रपूर ,दि.२९,ः-मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे, अशी माहिती वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रमेश आले आणि मनीषा धुर्वे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना मुनगंटीवार यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही सांगितले.हे विद्यार्थी २९ मे रोजी मुंबईत दाखल होत असून राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या धाडसी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
एव्हरेस्ट सर करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची मान देशपातळीवर अभिमानाने उंचावली असल्याने या कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रमेश आडे आणि मनीषा धुर्वे या पाच विद्यार्थ्यांना गृहविभागात नोकरी देण्याची मागणीही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या पाच विद्यार्थ्यांनी १६ मे रोजी एव्हरेस्ट सर करीत चंद्रपूरसह आणि महाराष्ट्राचा ध्वज फडकवला. या धाडसाची दखल रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात घेतली. राज्याच्या आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला ‘मिशन शौर्य’च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रशिक्षित केले होते. चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभाग गेले वर्षभर या मोहिमेसाठी विविध आघाड्यांवर प्रयत्नरत होते. चंद्रपूरसारख्या आदिवासी भागात मुळात काटक असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना थंड प्रदेशातील एव्हरेस्टच्या मोहिमेवर सिद्ध करण्यासाठी उत्तर भारतातील महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांमधून वेगवेगळ्या चाचण्या करीत १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या खडतर प्रवासात शेवटी पाच विद्यार्थी यशस्वी ठरले.