31.3 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home Featured News आईच्या निधनाचा निरोप आला तरी किर्तन करत राहिले; तेरवी, मुंडणही न करण्याचा...

आईच्या निधनाचा निरोप आला तरी किर्तन करत राहिले; तेरवी, मुंडणही न करण्याचा सत्यपाल महाराजांचा निर्णय

आईचा देह केला वैद्यकीय महाविद्यालयाला दान, वृद्धांसाठी अन्नदान

0
134

अकोला,दि.23 – प्रख्यात सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांचे वर्धा जिल्ह्यातील एका गावात सायंकाळी कीर्तन सुरू असतानाच अकोटमध्ये घरी शुक्रवारी त्यांच्या आई सुशीलाबाई चिंचोळकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कीर्तन सुरू असताना अंतिम दर्शनासाठी घरी तत्काळ निघता येणे शक्य नसल्याने आईच्या इच्छेप्रमाणे अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करावे, असे त्यांनी नातेवाइकांना सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सर्वोपचारमध्ये येऊन त्यांनी आईचे अंतिम दर्शन घेतले.

दरम्यान, आईच्या निधनानंतर मी केशदान करणार नाही, तेरवी करणार नाही. २१ मेपासून माझ्या आश्रमात मी गरीब व गरजू वृद्ध व्यक्तींसाठी दैनंदिन जे‌वणाची व्यवस्था करणार आहे, असे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक तथा राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी शनिवारी जाहीर केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवात ते बोलत होते.यावेळी बोलताना सत्यपाल महाराज यांनी परंपरांना फाटा देत त्याऐवजी गरजू ज्येष्ठांना अन्नदान करण्याचा संकल्प केला. हाच ग्रामगीतेचा विचार आहे. तसेच अज्ञातांच्या गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट येथील माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांनाही यावेळी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

‘मरने की फिकर क्यों करता है?’

सत्यपाल महाराज म्हणाले, आपल्यावरही चाकूहल्ला झाला होता. मात्र ‘मरने की फिकर क्यों करता है? मरना तो बराबर आयेगा. तू ऐसी फिकर कर ले मन में, मरना तुझसे झुक जायेगा’ या भजनाप्रमाणे आपण निरंतर कार्य करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ २१०० रुपयांचा निधी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीला दिला.