उस्मानाबाद, दि. १४ – शेतक-यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आजपासून एक महिन्याने म्हणजे १४ सप्टेंबर पासून जनावरांसहीत जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० दिवसात एकदाही सभागृहात आले नाहीत याचा उल्लेख करत भाजपाचे नेते भगवे घालून येतात त्यांना शेतक-यांशी काही देणंघेणं नाही अशी टीकाही पवारांनी केली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पवारांसोबत आहेत. शेतकरी, अधिकारी आणि आपल्या कार्यकर्त्यांशी भेटी घेतल्यानंतर दुष्काळ आढावा परिषदेच्या माध्यमातून ते संवाद साधणार आहेत. उस्मानाबादेत दुपारी दोन वाजता दुष्काळ परिषदेत ते बोलत होते.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल 35 वर्षांनी पुन्हा एकदा आंदोलनात सहभागी झाले आहेत. शरद पवारांच्या राजकीय कार्यकाळातील हा दुसरा मोठा मोर्चा मानला जात आहे.




