ठाणे, दि. 1 – ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती, जलसंधारण, आदिवासी विकास, या क्षेत्रांबरोबरच शहरातही मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारत आहेत. सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात अनेक योजना प्रगतीपथावर असून त्यातील काही योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही नगर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत येथील पोलीस मैदानात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त जय जित सिंह, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, कोकण परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक संजय मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम देशमाने आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल, होमगार्ड, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, महिला पोलीस, ठाणे महापालिका सुरक्षा दल आदींनी मानवंदना देऊन संचलन सादर केले. पालकमंत्री श्री. शिंदे यांनी संचलनातील दलाचे निरीक्षण केले. यावेळी पालकमंत्र्यांनी दिवंगत आणि शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवाराशी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पोलीस बांधवांच्या परिवारातील सदस्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी ही विकासाची दोन्ही चाके समानरितीने चालत असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचा विकास होत आहे. कोवीड काळात जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस दलानेही एकदिलाने अतिशय उत्तम काम केले आहे. ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या वर्षभरात अतिशय उल्लेखनीय काम केलं असून त्या बळावर त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
महाआवास अभियान 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील सर्वोकृष्ट जिल्ह्याचा तृतीय क्रमांक ठाणे जिल्ह्याला जाहीर झालाय. तसेच ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ गटात भिवंडी तालुक्यातील ‘चिचवली ग्रामपंचायतीस प्रथम’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोकृष्ट विभागातील प्रथम पुरस्कार कोकण विभागाला जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुल योजनेतून सुमारे 9 हजार 610 घरे बांधली आहेत. राज्य शासनाने राबविलेल्या महाआवास अभियान टप्पा 2 मध्ये 175 घरकुले पूर्ण झाली आहेत. या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट सिटी अभियानामध्ये यंदा जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महानगरपालिकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला राष्ट्रीय पातळीवरील कोविड इनोव्हेशन पुरस्कार मिळाला आहे. तर ठाणे स्मार्ट सिटीचा समावेश देशातील 100 शहरांमधील पहिल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. ‘डिजी ठाणे’ या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचेही श्री. शिंदे यावेळी म्हणाले .
श्री. शिंदे म्हणाले की, सन 2021-22 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला 450 कोटींचा निधी दिला होता. हा सर्व निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यांतील नागरी क्षेत्रातील सेवा सुविधांसाठी विशेष अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. यानुसार आगामी वर्षासाठी अतिरिक्त 143 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 475 कोटी रुपयांच्या नियतव्ययामध्ये या विशेष निधीची भर पडली असून आता जिल्ह्याचा एकूण नियतव्यय 618 कोटी रुपयांचा झाला आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून गेल्या वर्षी जिल्ह्यातील पोलीस दलाच्या बळकटीकरणाअंतर्गत 5 कोटी 88 ला
पालकमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्याचे रूपांतर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात होणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने 213 कोटींची सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे आधीचे 314 आणि आताचे 213 अशा 527 कोटींचा निधी मंजूर झाला असून या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात एकूण 900 बेडस् असणार आहेत. तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयाला लागून असलेल्या एसटी वर्कशॉपच्या जागेचा पुनर्विकास करून त्याजागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.
ठाणे शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, मुंब्रा येथील धोकादायक इमारतीचा विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सिडको आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्याचप्रमाणे खारीगाव येथील उड्डाण पुलामुळे रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात टळण्यास मदत होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते चेंबूरपर्यंतचा फ्रीवे ठाण्यापर्यंत आणण्यात येणार आहे. तीन हात नाका, नितीन व कॅडबरी जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रेड सेपरेटर प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
मुंबई विद्यापीठाच्या ठाणे व कल्याण उपकेंद्रांना धर्मवीर आनंद दिघे यांचे देण्याचे निश्चित झाले आहे. ठाणे शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक टाऊन हॉलच्या नुतनीकरणाचे उद्घाटन आज होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
6 मे रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त विविध योजनांचा राज्यभर जागर करण्यात येणार असल्याचही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या हिरक महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीसांचा तसेच स्काऊट गाईडमधील उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थी शिक्षक, जिल्हा परिषदेचा स्व. आर.आर. आबा सुंदर गाव अभियानातील विजेत्या गावांचा, स्मार्ट ग्राम योजना, आदी विविध योजनेतील विजेत्यांचा, महानगरपालिकेच्या उत्कृष्ट कर्मचारी यांचा पालकमंत्री श्री. शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सामाजिक न्याय विभागाच्या विशेष दालनाला पालकमंत्र्यांची भेट
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी मुख्य शासकीय समारंभाच्या ठिकाणी ठाणे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने विशेष स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यवरांसह भेट घेऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली.