राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

0
4

मुंबई, दि. 30 : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक  देत आहोत.  अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३ हजार ६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे राज्यात एकूण ४ हजार ४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात  १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. आज दालमिया फाऊंडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूर मधील १० अंगणवाड्या दुरूस्तीसाठी, भागीरथी फांऊडेशनने पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे १५ अंगणवाडी दुरूस्तीसाठी, कॉरबेट फाऊंडेशन पुणे येथे १६ अंगणवाड्या दुरूस्तीसाठी व पूर्व शालेय शिक्षण, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील २० अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, आर.एस.एस.जनकल्याण समितीने मुंबई उपनगर मधील २५ अंगणवाडी बळकटीकरण, होप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुणे येथे ४१ अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, युनायटेड वे दिल्ली पुणे ४५ अंगणवाडी दुरूस्ती, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१  यांनी पुणे येथील १०० अंगणवाडी दुरुस्ती, के कॉर्प फांउडेशन  गडचिरोली, नंदुरबार १७९ अंगणवाडी दुरूस्ती आणि न्युट्रीशियन, यार्दी फाउंडेशन पुणे ३०० अंगणवाडी दुरूस्ती, न्युट्रीशियन  तसेच क्षमता वृद्धीसाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत.

पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सर्वोत्कृष्ट काम केलेल्या जिल्हा आणि नागरी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा सत्कार

पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांची आधार सिडींगमध्ये यशस्वी नोंद घेतलेल्या भंडारा जिल्ह्याचा ९८ टक्के नोंद केल्याबद्दल प्रथम क्रमांक, पालघरमध्ये ९७ टक्के नोंद केल्याबद्दल द्वितीय क्रमांक, हिंगोली जिल्ह्याचा ९६ टक्के नोंद केल्याबद्दल तृतीय क्रमांक आहे.

तर नागरी प्रकल्पामध्ये तुंगा मोहिली, मुंबईमध्ये ९९ टक्के नोंद  असल्याने प्रथम क्रमांक, घाटकोपर १ मुंबई ९८.२ टक्के नोंद असल्याने द्व‍ितीय क्रमांक, तर दापोडी बोपोडी मुंबई ९८ टक्के नोंद असल्याने तृतीय क्रमांक आहे. या जिल्ह्यांना व नागरी बाल विकास प्रकल्पांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

आयसीडीएस योजनेसोबत प्रशंसनीय काम केल्याबद्दल सीएसआर कंपनी पारले ॲग्रो प्रा.लिमिटेड, यार्दी सॉफ्टवेअर इंडिया प्रा.लिमिटेड यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.  पुणे १ नागरी प्रकल्पच्या महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी सीएसआर सहभाग वाढविल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, दालमिया फांउडेशन,भागीरथी फांउडेशन, कॉरबेट फाउंडेशन, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद,आर.एस.एस.जनकल्याण समिती, होप फॉर दि चिल्ड्रेन, युनायटेड वे दिल्ली, रोटरी डिस्ट्रीक्ट,के कॉर्प फांउडेशन,यार्दी फाउंडेशन यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.