नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
6

नवी दिल्ली, २८ : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

राजधानी नवी दिल्लीतील नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज पार पडले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री, दोन्ही सभागृहाचे खासदार, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, विविध मंत्रालयांचे सचिव, माजी केंद्रीय मंत्री, संसदेचे दोन्ही सभागृहांचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

नवीन संसदेच्या निर्मितीबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, प्रखर देशाभिमानी असलेल्या प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे. त्यांनी मांडलेल्या ऐतिहासिक अशा वास्तूचे आज लोकार्पण झाले असून, संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट, वृद्धिंगत होईल असा विश्वास आहे. आजचा दिवस हा १४० कोटी जनतेसाठी अभिमानाचा दिवस आहे. प्रधानमंत्री श्री.मोदींनी विक्रमी वेळेत संसदेचे बांधकाम पूर्ण केल्याचे सांगत त्यांनी प्रधानमंत्री श्री. मोदींचे आभार मानले.

दरम्यान, नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी सर्वधर्म प्रार्थना सभा झाली. मुख्यमंत्री श्री. शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी लोकशाही मंदिराचे वातावरण अतिशय भक्तीमय झाले झाल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या कार्यक्रमात प्रधानमंत्री श्री. मोदींनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. नंतर या नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभार लावलेल्या कामगारांचा गौरव देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केला.

 

दरम्यान, नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४० वी जयंती महाराष्ट्र सदनात साजरी झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे-पाटील, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्यासह खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, उन्मेश पाटील, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, रणजित सिंह नाईक-निंबाळकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, राजेंद्र गावित उपस्थित होते.