भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनासाठी उसळला जनसागर

0
7

मिरवणुका, प्रभात फेऱ्या, ज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमांचेही आयोजन

नांदेड दि.14:-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती दिनानिमित्त त्यांना अलोट जनसागराने मिरवणुका, प्रभात फेऱ्या तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन केले. डॉ आंबेडकर यांच्या अभिवादनासाठीचा कार्यक्रम, उपक्रमांनी शहर-जिल्ह्यात दिवसभर लगबग राहिली. प्रभातफेऱ्या, प्रबोधनपर कार्यक्रम, व्याख्याने-विविध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. राज्य सरकारने 14 एप्रिल हा दिवस भारतरत्न डॅा. आंबेडकर यांच्या अद्वितीय विद्वत्तेला अभिवादनासाठी यापुढे “ज्ञान दिन” म्हणून साजरा करण्याचेही निश्चित केले आहे. या ज्ञान दिनानिमित्तही डॅा. आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेचेप्रदर्शन, पुस्तकांचे, चरित्राची ओळख करून देणाऱ्या पुस्तिकांचे वाटप असे उपक्रमही आयोजित करण्यात आले.जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच शहरासह, जिल्ह्यातील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारासह शहरातील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात नागरिक एकत्र आले. पुतळ्यास अभिवादन करतानाच, शहर आणि परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.डॅा. आंबेडकर यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सामजिक न्याय व समता सप्ताहाचा आज जंयती दिनी अभिवादनाने समारोप करण्यात आला. त्यासाठी सकाळी विविध संघटना, संस्था यांच्यावतीने डॅा. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, विविध यंत्रणांनाचे प्रमुख आदींनीही अभिवादन केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी डॅा. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनी उपस्थितांना डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन केले, तसेच जयंती दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, तहसिलदार किरण अंबेकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भगवान वीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती.दिवसभरही नांदेड शहरात मिरवणुका, रॅली यांचा जल्लोष राहिला. आयटीआय चौक येथील महात्मा ज्योतिबा पुतळा चौकातून अनेक पदफेऱ्या, दौड काढण्यात आल्या. यानिमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांनाही पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुका, पदफेऱ्या यांच्यात सहभागींसाठी शहरातील विविध मार्गा-मार्गावर ठिक-ठिकाणी संस्था, संघटना, उत्सव मंडळांनी उत्स्फुर्तपणे पिण्याचे पाणी, फराळ, फळे वाटप केले. मिरवणुकांसाठीशहरातील वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला पर्यायी मार्ग देऊन , उत्कृष्ट नियोजन केले. तसेच गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीतील विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तहीठेवण्यात आला.