साहित्य संमेलन आता बडोद्यात

0
13

नागपूर,दि.19 : आयोजनामुळे वादात सापडलेल्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ अखेर निश्चित झाले आहे. बडोद्याच्या मराठी वाङ्मय परिषदेने हे संमेलन घेण्याची तयारी दाखविल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांच्या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे बडोद्यात होणारे हे चौथे मराठी साहित्य संमेलन ठरणार आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बडोद्यात आयोजित होणारे हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठरणार आहे. यापूर्वी १९०९ (सातवे संमेलन), १९२१ (अकरावे संमेलन) व १९३४ (विसावे संमेलन) बडोदा येथे आयोजित करण्यात आले होते.
स्थळ निवड समितीने यजमानपदाचा मान बुलडाण्याच्या हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रम संस्थेला देऊनही अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या स्थळावर आक्षेप घेतल्याने आश्रमाला आपला प्रस्ताव मागे घ्यावा लागला.त्यानंतर लगेचच महामंडळाच्या घटना व नियमांनुसार संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी कार्यवाही सुरू केली.बडोद्याच्या निमंत्रकांनी संमेलन आयोजित करण्याची तयारी दाखविल्याने महामंडळाने बडोदा येथे संमेलन आयोजित केले जावे, असा निर्णय घेतल्याचे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले. बडोद्याच्या मराठी वाङ्मय परिषदेनेही याचा स्वीकार केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.