आमच्यावर कारवाई करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाहवर कारवाई करा,उद्धव ठाकरे यांचं थेट निवडणूक आयोगाला आव्हान

0
10

आमच्या अस्मितेशी तडजोड करणार नाही. तुम्हाला जी कारवाई करायची ती करा,आम्ही आमच्या निर्णयावर ठाम

मुंबई:-:-निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावत मशाल गीतावर आक्षेप घेतला आहे. मशाल गीतातील जय भवानी आणि हिंदू धर्म या दोन शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत हे दोन्ही शब्द काढून टाकायला सांगितले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गीतातील जय भवानी हा शब्द काढण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. जय भवानी हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. आमच्या अस्मितेशी तडजोड करणार नाही. तुम्हाला जी कारवाई करायची ती करा, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, असं सांगतानाच आमच्यावर कारवाई करायची असेल तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर कारवाई करा, मगच आमच्यावर कारवाई करा, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. आम्ही याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढू, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

निवडणूक आयोगाची नोटीस येताच उद्धव ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला ललकारले आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणासह पाच राज्यांच्या निवडणुका होत्या. या पाचही राज्याच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धार्मिक मुद्दा उपस्थित केला होता. मोदींना जय बजरंग बलीचं म्हणून कमळाला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं. तर आम्हाला राज्यात सत्ता दिली तर तुम्हाला अयोध्येत मोफत राम दर्शन घडवून आणू, असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं होतं. मोदी आणि शाह यांच्या विधानाला आम्ही आक्षेप घेत निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती. निवडणुकीत धार्मिक मुद्दे घेतले तर चालतात का? तुम्ही तुमच्या कायद्यात काही बदल केला आहे का? केले असतील तर आम्हाला सांगा? नसेल केले तर मोदी आणि शाह यांनी धर्माचा आधार घेऊन मते मागितल्याने त्यांच्यावर काय कारवाई केली याची माहिती देण्यास आम्ही आयोगाला सांगितलं होतं. त्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क कसा हिरावून घेण्यात आला होता, याची माहितीही आयोगाला दिली होती, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

तो शब्द काढणार नाहीचउध्दव ठाकरे

निवडणूक आयोगाने आम्हाल मोदी आणि शाह यांच्यावरील कारवाईबाबत किंवा कायद्यात बदल झाल्याबाबत काहीही कळवलं नाही. त्यामुळे आम्ही आयोगाला स्मरणपत्रही लिहिलं होतं. त्यालाही उत्तर आलं नाही. मात्र, आम्हाला नोटीस पाठवून आमच्या मशाल गीतातील दोन शब्दांवर निवडणूक आयोगाने हरकत घेतली आहे. हिंदू धर्म आणि जय भवानी हा शब्द काढण्यास आम्हाला सांगितलं आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर जी कारवाई करायची ती करा. आम्ही शब्द काढणार नाही. आधी मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई करा. मगच आमच्यावर कारवाई करा, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

राज्यकर्त्यांना मान्य आहे काय?

आज देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतात. त्यांचे चाकर म्हणून निवडणूक आयोग काम करत आहे. आयोगाने आम्हाला हिंदू धर्म शब्द हटवण्यास सांगितलं आहे. हे या राज्यकर्त्यांना मान्य आहे काय? असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.