हिवाळी अधिवेशन 10 दिवस चालणार

0
16

मुंबई,दि.29- हिवाळी अधिवेशन केवळ 10 दिवस होणार असल्याने विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीने याबाबतच्या बैठकीत निर्णय घेतल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या अधिवेशनात नवीन 13 विधेयके आणि 11 अध्यादेश मांडले जाणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिली.विरोधी पक्षांनी कामकाजाच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी केली आहे. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट म्हणाले की, हिवाळी सत्रासाठी सरकार तयार आहे. सरकार विरोधकांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. पण विरोधकांनी सदनात गोंधळ घालण्यापेक्षा चर्चेवर भर दिला पाहिजे.आम्हा कामकाज चालविण्यासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य हवे आहे. आम्हाला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष कामकाज सुरु राहावे यासाठी सहकार्य करतील.

बापट म्हणाले की, अधिवेशनादरम्यान पुरवणी मागण्यांनाही मंजूरी देण्यात येणार आहे. सरकारच्या वतीने शिर्डी विमानतळाच्या नाम विस्ताराचा प्रस्तावही ठेवण्यात येणार आहे.नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानच 20 डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. जर कामकाज होऊ शकले नाही आणि विदर्भासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली नाही तर अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात येईल.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांचा हवा: विरोधी पक्ष
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे. मुंडे म्हणाले की विदर्भासारख्या मागास भागात होणारे हे अधिवेशन किमान चार आठवडे तरी चालले पाहिजे. प्रादेशिक असंतुलनाबाबत केळकर समितीच्या अहवालावर डिसेंबर 2014 मध्ये चर्चा झाली होती. त्यावर कार्यवाही समितीच्या अहवालावर चर्चा झाली पाहिजे. राज्याच्या मागास भागात संतुलित विकास झाला पाहिजे.