हल्लेखोर आमच्या मागावर होते‌ – उमाताई पानसरे

0
25

कोल्हापूर – मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी शुद्ध मराठीमध्ये आम्हाला ‘इथे मोरे कुठे राहतात?’ अशी विचारणा केली आणि त्यानंतर येऊन त्यांनी आम्हाला गोळ्या घातल्या. ते आमच्या पाळतीवरच होते, अशी माहिती कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांनी दिली. हल्ल्यानंतर त्यांनी एका दूरचित्रवाहिनीला पहिल्यांदाच मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी हा खुलासा केला.

१६ फेब्रुवारीला पानसरे दांपत्य फिरायला गेले असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी गोविंद पानसरे यांचे मुंबईत निधन झाले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या उमाताईंवर चांगले उपचार झाल्यामुळे त्या आता बोलू लागल्या आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकूणच या प्रकाराबद्दल मत मांडले. पानसरे यांचा
नेहमीच धार्मिक कर्मकांडांना विरोध होता. त्याविरोधात त्यांनी लढाच पुकारला होता. ज्या दिवशी हल्ला झाला त्याच दिवशी वकिलांचा फोन आला होता. आपण दावा जिंकू, असे ते सांगत होते. यानंतरच हा हल्ला झाला, असे त्यांनी सांगितले. त्यांचे जनजागरण सुरू असताना अनेकांचे धमक्यांचे फोन यायचे, पत्रे यायची. परंतु हे ज्यांना पटत नाहीत, ज्यांना यातील काही कळत नाही ते असा विरोध करत राहणारच, असे ते नेहमी मला सांगत असत, अशी आठवणही उमाताईंनी सांगितली.

आमचा हा लढा असाच सुरू राहील
उमाताईंच्या डोक्याला गोळी चाटून गेल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. यानंतर गेल्या आठवड्यात त्यांना घरी आणण्यात आले. तुटक तुटक बोलतानाही त्यांनी अण्णांचा हा लढा पुढे चालूच ठेवण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.