24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home महाराष्ट्र शासनाच्या सूचनानंतरच बाजारपेठा सुरू करण्याबाबत निर्णय – कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ....

शासनाच्या सूचनानंतरच बाजारपेठा सुरू करण्याबाबत निर्णय – कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

0
142

सांगली, दि. १६ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी देशभर १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊननंतर १८ मे पासून काही सवलती मिळतात का याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर बाजारपेठा कशा पध्दतीने सुरू करता येतील यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम म्हणाले, व्यापारी असोसिएशनकडून बाजारपेठा कशा पध्दतीने सुरू करता येतील याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या आहेत. शासनाकडून १८ मे पासून काही शिथीलता मिळते का याबाबतच्या मार्गदशक सूचनांची तसेच व्यापाऱ्यांकडून आलेल्या सूचनांची सांगड घालून बाजारपेठा कशा प्रकारे सुरू करता येतील याबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहेच, यासाठी व्यापाऱ्यांचे सहकार्य ही मिळत आहे. आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी व्यवहार हे सुरू करावेच लागणार आहेत. यासाठी कोरोना दैनंदिन जीवनाचा भाग आहे असे समजून आवश्यक ती खबरदारी घेऊन व्यवहार सुरू करावे लागणार आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे, तसेच नियमित मास्कचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व व्यापारी यांच्याकडून बाजारपेठेतील दुकाने कशा पध्दतीने सुरू करता येतील याबाबत ॲडव्हायझरी प्राप्त झाली असून शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. प्रारंभी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व व्यापारी यांनी बाजारपेठेतील दुकाने कशा प्रकारे सुरू करता येतील याबाबतच्या विविध सूचना त्यांनी बैठकीत मांडल्या व बाजारपेठेतील दुकाने विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.