फिरोजाबाद, दि. 20 – उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथे तुंडला रेल्वे स्थानकावर कालिंदी एक्स्पेसने मालगाडीला टक्कर दिली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, रेल्वेच तीन डबे मात्र रुळावरुन घसरले आहेत. कालिंदी एक्स्प्रेच्या इंजिनसहित जनरल डब्याचं नुकसान झालं आहे. अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र मोठी दुर्घटना टळली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत कानपूरजवळ झालेली ही तिसरी रेल्वे दुर्घटना आहे.14723 कानपूर-भिवानी कालिंदी एक्सप्रेस तुंडला स्थानकावर पोहोचली असताना हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. रेल्वेचा स्पीड कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतीच मदत न मिळाल्याने प्रवाशांचा संताप झाला होता. यानंतर त्यांनी रेल्वेविरोधात घोषणा देण्यासही सुरुवात केली. काही लोकांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंना ट्विट करत मदत मिळत नसल्याची तक्रार केली.