नवी दिल्ली(एजंसी), 5 जून : कोरोना संकटांच्या मुकाबल्यासाठी मोदी सरकारच्या उपाययोजनांवर बजाज ऑटोचे महासंचालक राजीव बजाज यांनी कडाडून टीका केली. भारतात लागू केलेला लॉकडाऊन भयंकर असल्याचे म्हणताना बजाज यांनी गरिबांना थेट आर्थिक मदत न देण्याच्या सरकारच्या धोरणावरही सवाल उपस्थित केला. मात्र याचवेळी अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केेंद्र सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतले नसते तर देश मोठ्या संकटात सापडला असता असा दावा करुन खळबळ उडवून दिली. काँग्रेस नेते राहुल गांधींनी कोरोना संकटावर साधलेल्या संवादादरम्यान बजाज ऑटोचे महासंचालक राजीव बजाज आणि अदानी गृपचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यात हे राजीनाराजीचे नाट्य घडले. लॉकडाऊन आणि आर्थिक संकटाबाबत राहूल यांनी रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला होता. याच मालिकेत त्यांनी राजीव बजाज यांच्याशी चर्चा केली.
चर्चेदरम्यान राजीव बजाज यांनी जगातील इतर एकाही देशामध्ये अशा लॉकडाऊन लागू झाल्याचे ऐकिवात नाही, अशा शब्दात लॉकडाऊनवर टीका केली. ते म्हणाले की, कोरोनाशी मुकाबला करताना भारताने पूर्वेकडील देशाऐवजी पाशचात्य देशांकडे पाहण्यात धन्यता मानली. पाश्चात्यांची नक्कल करताना कठोरपणे लॉकडाऊन लागू करण्याचा प्रयत्न केला.मात्र तोही योग्य प्रकारे झाला नाही आणि यामुळे अर्थव्यवस्थाच उद्धवस्त झाली असा दावा त्यांनी केला. पंतप्रधानांच्या निर्णयाचे समर्थन करीत गौतम अदानी म्हणाले की, सर्वात मोठा उत्पादक तसेच सेवा पुरवणारा देश बनवण्यासाठी चालून आलेली योग्य संधी पंतप्रधानांनी यावेळी साधलीा आहे. कोणत्याही संकल्पना या 100 टक्के बरोबर किंवा चूक नसतात. मात्र विवेकाने निर्णय घेत मिळालेल्या माहितीच्या आधारे वाटचाल केली तर यश अशक्य नसते असेही त्यांनी सांगितले.





