पहिला दिवस गोंधळाचा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

0
13

नवी दिल्ली, दि. २१ – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ललित मोदी प्रकरणावरुन राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहबूक करावे लागले. फरार आरोपीला सुषमा स्वराज यांनी मदत केली व यावर पंतप्रधान गप्प का असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधा-यांवर हल्लाबोल केला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याची झलक बघायला मिळाली. लोकसभेत निधन झालेल्या माजी खासदारांना श्रद्धांजली अर्पण करत दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. तर राज्यसभेचे कामकाज सुरु होताच काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी ललित मोदी प्रकरण मांडले. एका फरार आरोपीला सुषमा स्वराज यांनी ट्रॅव्हल डॉक्यूमेट मिळवून देण्यात मदत केली, आता याच डॉक्यूमेंटच्या आधारे ललित मोदी परदेशात मजा करत आहेत असा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकरणावर नरेंद्र मोदी गप्प का, त्यांची सर्व आश्वासनं खोटी ठरत आहेत अशी घणाघाती टीकाही आनंद शर्मा यांनी केली. केंद्र सरकारतर्फे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत भूमिका मांडली. आम्ही या मुद्द्यावर चर्चेला तयार असून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या स्वतः या प्रकरणावर स्पष्टीकरण देतील असे अरुण जेटलींनी सांगितले. मात्र यानंतरही विरोधकांनी गदारोळ सुरुच ठेवल्याने दुपारी १२ पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.