
‘संवाद यात्रा; गडचिरोलीत कार्यकर्त्यांसोबत प्रदेशाध्यक्षांनी साधला संवाद
गडचिरोली, १० ऑगस्ट–कॉंग्रेस,भाजप सारखे पक्ष आरक्षण विरोधी आहेत. हे दोन्ही राजकीय पक्ष आदिवासी समाजाला न्याय मिळवून देवू शकत नाही. ओबीसी बांधवांना देखील त्यांच्या हक्काचे आरक्षण ते देवू शकत नाहीत. अशात आदिवासी,ओबीसी समाजाला केवळ बहन मायावतींच्या नेतृत्वात बसपाच न्याय मिळवून देवू शकते, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी मंगळवारी गडचिरोलीत केले. संवाद यात्रा आज गडचिरोलीत पोहचली होती. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तरूण वर्गाला संंबोधित करीत बसपाच्या संघटनात्मक बांधणीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, गडचिरोली जिल्हा हा राज्यभरात वनसंपदेने संपन्न आहे. पंरतु, केवळ आदिवासी बहुल असल्याने राज्य सरकारकडून या जिल्ह्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते.अशात आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी केवळ बसपाच पर्याय आहे. देशातील आदिवासी समाजाच्या हितासाठी आणि हितसंवर्धनासाठी केवळ बसपा काम करीत आहे. बहुजन समाज पार्टीचा जन्मच आरक्षणाच्या रक्षणासाठी झाला.पंरतु, राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल सत्ताधारी आदिवासीच्या न्याय हक्कांकडे नेहमी पाठ फिरवतात. अशात आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी बसपा आरपारची लढाई लढेल,असे आवाहन देखील अँड.ताजने यांनी यावेळी केले.
संवाद यात्रेच्या कार्यक्रमाची सुरूवात तरूणींच्या नृत्य पथकाकडून पारंपारिक नृत्य सादरीकरणातून झाली. कार्यक्रमात बसपाचे प्रदेश महासचिव अँड.सुनील डोंगरे ,जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट, रमेश मडावी, वामन राऊत, मारोती वनकर, अनिल साखरे, जयेंद्र गायकवाड, शंकर अलोणे, कुणाल कोहळे, कैलाश कोंडागुर्ला, सौजन्य कोये, प्रतिमा ताई कोरडे यांच्यासह इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
आदिवासी बांधवांचा स्वाभिमान,सन्मान केवळ बसपात-मा.प्रमोद रैना
दलित, वंचित तसेच आदिवासी बांधवांच्या उद्धारासाठी बसपाच एकमेव पर्याय आहे. देशातील आदिवासींचा सन्मान केवळ बसपाच वाढवू शकते. स्वाभिमानाने आदिवासींच्या हितसंरक्षणाचे काम बहन मायावती करीत आहे. त्यामुळे आदिवासी तसेच ओबीसी बांधवांनी बसपाच्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित येवून बसपाला सत्तासंघर्षात बळ द्यावे, असे आवाहन बसपाचे राज्य प्रभारी प्रमोद रैना यांच्याकडून करण्यात आले. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बसपा अगोदरपासूनच कटिबद्ध असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.