बारा आमदारांच्या यादीतून माझे नाव वगळा, राज्यपाल कोश्यारींची राजू शेट्टींनी घेतली भेट

0
35

सांगली,दि.09ः– सत्ताधारी महाविकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमधून आपले नाव वगळावे, अशी विनंती शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत केली.

आघाडी सरकारने दीड वर्षापूर्वी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली होती. यात राजू शेट्टी यांच्या नावाचा समावेश आहे. आपल्या नावाचा समावेश रद्द करावा यासाठी त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरून याआधीही मोठे घमासान सुरू होते. त्यातच राजू शेट्टी यांनी दिलेल्या निवेदनामुळे ही यादी आणखी काही महिने प्रलंबित ठेवली जाईल, असा सूर आहे. शेट्टी म्हणाले, राज्यात आघाडीचे सरकार स्थापन होताना आपण आघाडीसोबत होतो, परंतु हे सरकार सध्या शेतकरीविरोधी निर्णय घेत असल्याने आपली संघटना व पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधान परिषदेवर जाणे हे नैतिकतेत बसत नसल्याने आपण राज्यपालांकडे आपले नाव वगळावे, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.