भारत मुक्ती मोर्चाचा संघ मुख्यालयावर मोर्चा, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

0
29

नागपूर- संघ मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाची विचारधारा भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत त्यांनी संघ मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या मोर्चाला प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यातच रोखलं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

संघाची विचारधारा ही भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाने आज नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी या मोर्चाला पुढे जाऊ दिले नाही. पोलिसांनी रोखल्यामुळे कार्यकर्त्यांना इंदौरी चौकामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली.दरम्यान, भारत मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालयाच्या कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलक संघ मुख्यालयापर्यंत पोहोचू नयेत यासाठी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात येत आहे.