31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय “प्रिय मित्र देवेंद्र…. अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका,”राज ठाकरेंचं खुलं पत्र

“प्रिय मित्र देवेंद्र…. अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका,”राज ठाकरेंचं खुलं पत्र

0
65

मुंबई:-अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे सेना- काँग्रेस-राष्ट्रवादी महायुतीच्या ऋतुजा लटके व भाजप-शिंदे सेना-रिपाइंचे मुरजी पटेल यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी अर्ज भरले.दरम्यान, या पोटनिवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. परंतु आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आवाहन केलं आहे.

👉”आमदार कै रमेश लटके ह्यांच्या दुर्देवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक आहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं,” असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

👉मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असंही त्यांनी यात नमूद केलं आहे.

👉काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“भाजपामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या पत्रावर मला निर्णय घ्यायचा असेल तर मला पक्षातील सहकाऱ्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच बाळासाहेबांची शिवसेनादेखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही मला चर्चा करावी लागेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.तसेच “राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले आहे. आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू. यापूर्वीही आर.आर.पाटील यांच्या वेळेसची निवडणूक असेल किंवा नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका असतील, जेव्हा-जेव्हा आम्हाला अशाप्रकारे विनंती करण्यात आली, त्यावेळी आम्ही निर्णय घेतला आहे.

👉तसेच देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन आले. त्यावेळी अशा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तसेच, त्यांनी आम्हीही उमेदवार न देण्याची विनंती आशिष शेलारांकडे केली. त्यानंतर आता मला पत्र देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली आहे.” पुढे म्हणताना ते म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीमध्ये मी एकटा निर्णय करू शकत नाही. राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल, तर मला माझ्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांची चर्चा करावी लागेल. आम्ही उमेदवार घोषितही केलाय आणि उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. यापूर्वी अशा काही पोटनिवडणुकांमध्ये आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली तर त्यावेळी आम्ही माघार घेण्याची भूमिका घेतली होती.”पण या स्टेजला आता त्या संदर्भात काही भूमिका घ्यायची असेल तर मला घेता येत नाही. पक्षात या संदर्भात चर्चा करावी लागेल. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. जरूर आम्ही या पत्राचा गांभीर्यानं विचार करू, मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चे अंति घेता येईल.”, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

👉काय म्हटलंय राज ठाकरेंनी पत्रात?

प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!

एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे.

आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.

👉माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

👉मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगत.

👉असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.

आपला मित्र,

राज ठाकरे

🟥असे आहे राजकीय चित्र

🔺🔺मतदारसंघात १ लाख ५ हजार मराठी, ५८ हजार उत्तर भारतीय, ३८ हजार मुस्लीम, ३३ हजार गुजराती, १९ हजार दाक्षिणात्य आणि १४ हजार ख्रिश्चन मतदार आहेत.

महानगरपालिकेचे ८ प्रभाग आहेत. यातील ५ प्रभागात उद्धव ठाकरे गटाचे असून, दोन भाजपचे व एक काँग्रेसचा नगरसेवक आहे.

🔺🔺संभाजी ब्रिगेडने ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला आहे. तसे पत्र ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी पाठवले.