‘……. मग गर्दीच्या ठिकाणी जाताच कशाला?’’; ऋता आव्हाड यांचा संतप्त सवाल

0
38

मुबंई,दि.14ः- विधानसभा आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. यावर जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


ज्या महिलेने आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. ती महिला आधीच जामिनावर आहे. तसेच आव्हाड यांनी कार्यक्रमात ढकलल्यानंतर चार तासाने तुम्हाला ढकलल्याची जाणीव होते काय? असा सवाल करतानाच विनयभंग होतो तर मग गर्दीच्या ठिकाणी जाताच कशाला? असा संतप्त सवाल ऋता आव्हाड यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होती. सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता. अशा ठिकाणी कुणी कुणाला बाजूला केलं तरी कुणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या महिलेलाही गर्दीमुळे खांद्याला धरून बाजूला केलं असेल. पण चार तासानंतर आपल्याला बाजूला केलं याची या महिलेला जाणीव कशी झाली? चार तासानंतर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? हा काय पोरकटपणा आहे, असा संताप ऋता आव्हाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आव्हाडांनी ट्विट करत राजीनामा देत असल्याचं म्हटलंय. यानंतर आव्हाडांचे समर्थक संतापले आहेत. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत.


आव्हाड यांच्यावरचा हा आरोप चुकीचाच – अंजली दमानिया

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कळवा-मुंब्र्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायलं मिळतंय. आता या प्रकरणावर भ्रष्टाचार विरोधात लढणाऱ्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंजली दमानिया यांनी जितेंद्र आव्हाड प्रकरणावर ट्विट केलं आहे. विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कलम 354 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संतापलेल्या आव्हाड यांनी थेट विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कायर्यकर्ते आक्रमक झालेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कळवा-मुंब्रा बंदची हाक दिली आहे. मुंब्रा येथील अमृत नगर, गुलाब पार्क आणि कौसा या परिसरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.