गोंदिया,दि.13ः शहरातील प्रशासकीय कारभारासह नगरपरिषदेतील हलगर्जीपणा व दुर्लक्षाविरोधात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 10 दिवसात सर्व समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन आज दि.13 जानेवारी रोजी देण्यात आले.निवेदनात नगरपरिषदेत गेल्या 1 वर्षापासून प्रशासक राज असल्यामुळे नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चालविला जात आहे.शहरात भुयारी गटार योजनेमुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदले गेल्याने व अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य आहे. सर्वसामान्यांना श्वास घेणेही कठीण झाले आहे.कचरा व्यवस्थापन पूर्णपणे ठप्प झाल्याने जागोजागी कचरा साचलेला आहे.नाल्यांची साफसफाई होत नसल्याने डासांचा प्रभाव वाढलेला आहे.त्यातच बाजारपरिसरातील मुख्य रस्त्यासह प्रत्येक गल्लीबोळीतील रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्ते अरुंद पडल्याचे निवेदनात म्हटले आहे.10 दिवसाच्या आत या समस्या न सोडविल्यास काँग्रेसच्यावतीने जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, प्रदेश काँग्रेस सचिव अमर वराडे, पी.जी.कटरे,शहर काँग्रेस अध्यक्ष जहीर अहमद,अॅड योगेश अग्रवाल, आलोक मोहंती, नफीस सिद्दीकी, माजी सदस्य विष्णू नागरीकर, रुपाली उके, बाबा बागडे, हरीश तुळसकर, डॉ. जितेश राणे, राजीव ठाकरे, विजेंद्र बोरुंडे, अरविंद नागदेवे, नीलिमा नागदेवे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.




