शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे राष्ट्रवादी काँँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन

0
21

गोंदिया,दि.14ः-गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी मार्फत पाठविले.त्यामध्ये जिल्हयात शासनाच्या हमी भाव योजने अंतर्गत महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळा मार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या खरीप हंगामातील धान खरेदीची उद्दिष्ट वाढवुन देत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. खरीप हंगामातील धानाची लागवड व कृषी विभागांनी निश्चित केलेली उत्पादन क्षमतेला अनुसरून जिल्हयाला सुमारे 50 लक्ष क्विंटल खरेदी उद्दिष्ट अपेक्षित होते. परंतु जिल्हयाला फक्त 39 लक्ष क्विंटल उद्दिष्ट देण्यात आले. तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली पण अनेक शेतकऱ्यांच्या 7/12 ला नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर अत्यंत कमी दराने धान विक्री करण्याचा प्रसंग ओढवल्याचे म्हटले आहे.

शासनाने काही दिवसापूर्वी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केले. परंतु सदर बोनस सरासरी एकरी 375 रुपये मिळणार असून एक प्रकारची शेतकऱ्यांची थट्टा आहे.या दोन वर्षात रासायनिक खताचे, किटकनाशकाचे, मजुरीचे व डिझेलचे भाव गगणाला भिडले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1000 रुपये धानाला बोनस देण्यात यावे.शासकिय आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे 26 डिसेंबर पासुन चुकारे मिळालेले नाहीत,ते त्वरीत देण्यात यावे.दिवसाला 12 तास विज मिळत असल्याने शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने रब्बी पिकाचे नियोजन केले होते.परंतु 1 फेब्रुवारी पासून यात बदल होवून 8 तास विज देणे सुरु झाल्याने शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.त्यातच रात्री शेतात जाणे हे धोकादायक आहे.त्यामुळे दिवसा 12 तास विजपुरवठा करण्यात यावे असे म्हटले आहे.शिष्टमंडळात माजी आमदार राजेन्द्र जैन,जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर,नरेश माहेश्वरी,राजलक्ष्मी तुरकर,डाॅ.अविनाश काशीवार,सी.के.बिसेन,केतन तुरकर,सुनील पटले,शैलेश वासनिक,नागरतन बन्सोड,आरजू मेश्राम, कपिल बावनथडे, योगी येडे, रौनक ठाकूर सहित अन्य उपस्थित होते.