गावा-गावातील छोटे पक्ष संपवा! चंद्रशेखर बावनकुळे

0
7

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आपआपल्या जिल्ह्यातील छोटय़ा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा, असे थेट आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बावनकुळे बोलत होते. नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी आयोजित या मेळाव्याला केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, आमदार प्रवीण दटके उपस्थित होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, विविध राजकीय पक्षांचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे प्रत्येक बुथ प्रमुखांनी आपआपल्या जिल्ह्यातील जे छोटे पक्ष असतील अशा राजकीय पक्षातील किमान ५० पदाधिकांऱ्यांना आपल्या पक्षात घ्यावे आणि छोटे पक्ष संपवावे.  मला काय दिले यापेक्षा पक्षासाठी मी काय करु शकतो याचा विचार प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी करावा. आपल्या गळय़ातील दुपट्टा हेच आपल्यासाठी प्रमाणपत्र आहे. पक्षावर किंवा नेत्यावर नाराज होऊन काही उपयोग नाही. आपण नाराज असाल आणि काम करत नसाल तर आपली जागा दुसरे कुणी तरी घेईल. प्रत्येक आमदाराने १५ हजार तर खासदारांनी ३० हजार लोकांपर्यत नमो अ‍ॅप पोहचवायचे आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
भाजपचा कटू अनुभव-बच्चू कडू
लहान पक्षांना बरोबर घेऊन ठेचून काढण्याची भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे. त्याचा थोडा-थोडा अनुभव आम्हालाही येत आहे, असे विधान प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले. अकोला दौऱ्यावर शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘वापरा आणि फेका’ हे भाजपचे तत्त्व आहे. त्यामुळे मित्र पक्षांचा वापर करून भाजप त्यांना बाजूला सारतो, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी नुकतीच केली होती. सत्तेत सहभागी असलेल्या आमदार कडूंनी देखील त्यांच्या सुरात सूर मिळवत भाजपवर टीकास्त्र सोडले.