मुंबई-लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्यात एक मोठा गोप्यस्फोट करण्यात आलाय. राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. ईडीच्या कारवाईनंतर जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे होते, असं म्हणत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.
अशात शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व राज बाहेर काढले आहेत.”माझ्यासमोर केवळ दोनच पर्याय होते. एक म्हणजे गजाआड जाणं आणि दुसरं म्हणजे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं. दबाव तर होताच. मात्र पत्नीचेही नाव गोवण्यात आलं. त्यामुळे माझ्यावर तसा दुसरा पर्याय नव्हता. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली ती कोणावरही आणू नये.”, असं रायकर म्हणाले आहेत.
गेली 50 वर्षे मी बाळासाहेबांसोबत होतो, उद्धव ठाकरेंसोबत होतो. मात्र जेव्हा त्यांना सोडलं तेव्हा कुटुंबातील सदस्याला आपण सोडत आहे असं वाटत असल्याचं रायकर यांनी मुलाखतीत बोलत असताना सांगितलं आहे. त्यांच्या या खुलाश्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.यामुळे भाजपाविरोधात (BJP ) आणि महायुतीविरोधात रोष वाढु शकतो. निवडणुकीवर देखील याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या दबावतंत्रापुढे नेत्यांनी गुडघे टेकले?
महाविकास आघाडीकडून अगोदरपासूनच भाजपवर आरोप करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा देखील ’50 खोके एकदम ओके’ अशी घोषणा देण्यात आली. आमदारांना बंड करण्यासाठी कोटींची रक्कम देण्यात आली असं तेव्हा म्हटलं गेलं. अशात शिंदे गटाच्याच नेत्याने आतली गोष्ट बाहेर काढल्याने राज्यात सध्या याचीच चर्चा रंगली आहे.