नवी दिल्ली– लोकसभा निवडणुकांनंतर आता देशभरात चर्चा आहे ती नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधीची आणि त्यांच्या संभाव्य मंत्रीमंडळाची. पहिल्या दोन टर्ममध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत असल्यामुळे मोदींना इतर कोणत्याही घटकपक्षावर सत्तास्थापनेसाठी अवलंबून राहावं लागलं नव्हतं. यंदा मात्र भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल, इतकं संख्याबळ मिळालेलं नाही. त्यामुळे मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर यंदा मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये मंत्रीपदांची कशी वाटणी होते, हे महत्त्वाचं ठरणार असून महाराष्ट्रातील अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.
एकीकडे आज नरेंद्र मोदींसह संभाव्य मंत्र्यांची यादी तयार होत असून त्या त्या खासदारांना फोनही जात असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या एकाही खासदाराला मंत्रीपदासंदर्भात फोन आलेला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना किमान पहिल्या शपथविधीमध्ये मंत्रीपद मिळणार नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
सुनील तटकरेंच्या घरी बैठक,फडणवीस हजर!
शपथविधी काही तासांवर आलेला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत सुनील तटकरेंच्या घरी दाखल झाल्याचं दिसून आलं. यावेळी सुनील तटकरेंच्या घरी खुद्द अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ व वरीष्ठ नेते उपस्थित होते. तटकरेंच्या घरी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आधी देवेंद्र फडणवीस घरातून बाहेर पडले. त्यापाठोपाठ अजित पवार, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे एकाच कारमधून बंगल्यातून बाहेर पडले. मात्र, या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
दरम्यान, यासंदर्भात प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले, तेव्हा त्यांना माध्यमांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी “आत्तापर्यंत मला कोणताही निरोप आलेला नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसही तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले.
अजित पवार गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न
अजित पवार गटाला पहिल्या शपथविधी सोहळ्यात एकही मंत्रीपद देण्यात येणार नसून त्यासाठीच अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सुनील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते असं सांगितलं जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून चार जागांवर निवडणूक लढवण्यात आली. मात्र, त्यापैकी फक्त एकच जागा पक्षाला जिंकता आली. खुद्द बारामतीमध्येही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून १ लाख ६७ हजारांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
————————–