
लोकसभेतील पराभव.. विरोधी पक्षाच्या दुष्प्रचारामुळे-खा.प्रफुल पटेल
गोंदिया,दि.१६ः लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर पहिल्यांदा जिल्ह्याच्या भेटीवर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित गट) कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल पटेल यांनी येत्या विधानसभेच्या निवडणूका महायुतीसोबतच ८०-९० जागेवर लढणार असून यात गोंदिया विधानसभा मतदारसंघाकरीता आग्रही राहणार असल्याचे सांगितले.ते गोंदिया येथील नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन व आमदार मनोहर चंद्रिकापूरे उपस्थित होते.
लोकसभा मतदारसंघातील सहापैकी २ मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मिळालेल्या आघाडीतील मतामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे,हे विसरता येणार नसल्याचे सांगतच विधानसभेच्या निवडणूकीकरीता आम्ही गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जागावाटपात विद्यमान आमदारासह गोंदिया-तिरोडावरही विचारमंथन करणार आहोत.गोंदिया विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत जिंकून आलेला आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतावरच आलेला असल्याने यावेळी आम्ही गोंदिया मतदारसंघाचा विचार करणार असल्याचे खा.पटेलांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलतांना सांगितले.
लोकसभा निवडणूकीत विरोधी पक्षाने संविधान बदलणार असल्याचा मुद्दा रेठून धरला व त्या मुद्द्याला मागासवर्गीय समाजाने गृहीत धरल्याने महाराष्ट्रात एनडीएच्या महायुतीला फटका बसला.१० एप्रीलच्या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संविधान बदल प्रचारावर आपण कल्पना दिली होती,परंतू एवढा त्याचा परिणाम होईल असे वाटले नव्हते असे.खा.पटेल म्हणाले.संविधानाच्या मूळ गाभ्याला कुणीही हात लावू शकत नाही आणि तो बदलू ही शकत नाही.त्यातच संसदेत अनु.जाती व जनजाती समुहाचे खासदार १०० च्या वर असल्याने संविधान बदलाच्या विषयावर ते गप्प राहणार का अशा प्रतिप्रश्न करीत विरोधी पक्षांने चुकीचा प्रचार केल्याचे म्हणाले.महाराष्ट्रात मराठा आरक्षण महायुतीने दिले,परंंतू त्याचाही चुकीचा प्रचार झाल्याचे म्हणाले. 

खा.पटेल यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डाॅ.प्रशांत पडोळे व गडचिरोली-चिमूरचे खासदार डाॅ.नामदेवराव किरसान या दोघांचेही अभिनंदन करीत दोघांनी आपल्या मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडविण्याकरीता आता पुढे यावे,आपण त्यांना नक्की सहकार्य करू असे सांगतिले.लोकसभा निवडणूकीतील निकालाचे विधानसभेच्या निवडणूकीवर काहीच परिणाम होणार नसल्याचेही पटेल म्हणाले.
दोन्ही निवडणूका वेगवेगळ्या असतात,मुद्दे वेगळे असतात असे सांगत पुर्ण ताकदिने आम्ही विधानसभा लढणार असल्याचे म्हणाले.लवकरच राज्यातील सरकारचे मंत्रीमंडळ विस्तार होणार असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर अधिवेशनात युवक,बेरोजगार,महिलांकरीता चांगल्या योजना अमंलात आणण्याचे काम राज्यातील सरकार करणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.