नागपुरात भाजपा आणि रिपाइंची तुटली युती

0
17

नागपूर, दि. 6 – भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) यांची राज्यात युती आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही ही युती कायम होती. परंतु नागपुरात रिपाइं (आ) ला भाजपने एकही जागा सोडली नसल्याने ही युती तोडण्याचा निर्णय रिपाइं (आ) च्या नागपुरातील पार्लमेंट्री बोर्डाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आर. एस. वानखेडे, प्रा. पवन गजभिये, राजन वाघमारे, हरीष जनोरकर, विनोद थुल, कांतीलाल पखिड्डे, भीमराव मेश्राम, सतीश तांबे आणि राजेश ढेंगरे उपस्थित होते. या बैठकीत भाजपाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
जागा वाटपावरून सध्या सर्वच पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यातच मित्र पक्षांना समाधानकारक जागा न सुटल्याने तेसुद्धा प्रचंड नाराज आहेत. यात भाजपाचे मित्र पक्ष सर्वाधिक नाराज आहे. नागपुरात भाजपाची रिपाइं (आठवले) आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंच यांच्याशी युती आहे. रिपाइं आठवले यांची राज्यस्तरावर भाजपासोबत युती आहे. नागपुरात १५ जागांचा प्रस्ताव रिपाइंतर्फे भाजपाला देण्यात आला होता. परंतु ऐन वेळेवर रिपाइंला केवळ एक जागा सोडण्यात आल्याचे भाजपातर्फे जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत सांगण्यात आले आहे. सोडण्यात आलेल्या जागेवर ज्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे, ते उमेदवारही रिपाइं (आ)चे नसून भाजपाचेच आहेत. त्यामुळे रिपाइंला भाजपाने एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे रिपाइं (आ) च्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सन्मानजनक जागा सोडल्या तरच भाजपसोबत युती करू असे, असे रिपाइं (आ)च्या स्थानिक नेतृत्वातर्फे अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी सीताबर्डी येथील रिपाइं (आ)च्या शहर कार्यालयात नागपुरातील निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पार्लमेंट्री बोर्डाची बैठक बोलावण्यात आली होती.