चंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री – शेट्टी

0
11

मुंबई दि. 16 :– कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरू न शकलेले राज्यातील दहा लाख शेतकरी हे बोगस शेतकरी असल्याची मुक्ताफळे उधळणारे राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री असल्याचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लगाविला आहे. खासदार राजू शेट्टी म्हणाले, की वास्तविक सरकारच्या भोंगळ कारभारामुळे जर राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरता येत नसेल तर त्यांना थेट बोगस ठरविणे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. सरकार स्वत: कर्जमाफीबाबत गोंधळलेले आहे. कर्जमाफीबाबत वारंवार बदलेले निकष, नियम हेच दर्शवितात.

राज्यात तब्बल 1 कोटी 78 लाख शेतकरी खातेदार आहेत. त्या पैकी 1.25 कोटी कर्जदार शेतकरी आहेत, तर सरकारच्या दाव्यानुसार तब्बल 90 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार असून तब्बल 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार असल्याचे सरकारने वारंवार सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती फार वेगळी आहे. 66 कॉलमचा कर्जमाफी फॉर्म भरता भरता शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. सध्याच्या निकषानुसार जेमतेम 7-8 हजार कोटी रुपयांचीच कर्जमाफी होईल व इतरांना निकषाच्या कोड्यात अडकविले जाईल.