औरंगाबाद,दि.15(वृत्तसंस्था)- ऐक्यासाठी माझी भूमिका सकारात्मक आहे. सर्वांनी एकत्र यायला हवे. केवळ एका दिवशी एका स्टेजवर येऊन एेक्य होणार नाही. त्यासाठी फाॅर्म्युला तयार करावा लागेल. त्यासाठी दुय्यम स्थान स्वीकारण्याची तयारी आहे. मात्र पुन्हा गटबाजी होणार नाही याची काळजी समाजाने घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांशिवाय शक्तिशाली ऐक्य शक्य नसल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारला असला तरी त्या दिवशी लोकांच्या मनात संताप होता. त्यामुळे बंद पुकारला नसता तरी लोक रस्त्यावर आले असते. यामध्ये आरपीआयचे कार्यकर्ते आघाडीवर होते. प्रकाश आंबेडकर यांनी ऐक्याचे राजे व्हावे. मी सरदार व्हायला तयार आहे, असेही आठवले म्हणाले.रिपब्लिकन नेत्यांनी ऐक्य करावे तसेच भीमा कोरेगाव घटनेनंतर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करत पुण्यातून आलेल्या समता सैनिक दलाच्या आंदोलकांनी आठवले यांच्या सभेला विरोध करत घोषणाबाजी केली.