हिंमत असेल तर पुन्हा बहुमत सिद्ध करा- रामदास कदम

0
7

मुंबई-बहुमत नसून देखील केवळ आवाजी मतदानाने भाजपने विधानभवानात विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घटनेचा खून केला असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. भाजप विधानसभेत बहुमत सिद्धच करू शकलेले नाही, हिंमत असेल तर पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करून दाखवा असे आव्हान रामदास कदम यांनी केले आहे.
आवाजी मतदानानंतर मतविभाजनाची मागणी विरोधीपक्ष म्हणून आमच्याकडून करण्यात आली होती परंतु, विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली आणि फडणवीस सरकारला मंजूरी दिली. हे घटनेच्या विरोधात आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले.
राज्यपालांकडे विश्वासदर्शक ठराव विधानसभेत पुन्हा मांडण्यात यावा अशी मागणी शिवसेना करणार आहे. नियम धाब्यावर बसवून मंजूर करण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात राज्यपालांची भेट घेणार असून यासाठी काँग्रेस नेत्यांनाही सोबत घेण्याबाबत चर्चा करणार असल्याचे रामदास कदम म्हणाले.
भाजपचेच ४० आमदार त्यांच्यासोबत नव्हते म्हणून आपले भांडे फूटू नये यासाठी भाजपने केवळ आवाजी मतदानाने ठराव मंजूर करून घेतल्याचा गौप्यस्फोट देखील रामदास कदम यांनी यावेळी केला.