विराट, धवनची शतके; भारत विजयस्वप्न अधांतरी

0
9

वृत्तसंस्था

कॅनबेरा, दि. २० – ऑस्ट्रेलियाच्या ३४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दमदार फलंदाजी सुरु आहे. शिखर धवन पाठोपाठ विराट कोहलीनेही शानदार शतक झऴकवले आहे. विराटने ८४ चेंडूत शतकाला गवसणी घातली, विराट आता नाबाद (१०४) आणि शिखर नाबाद (११५) धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये दुस-या विकेटसाठी २०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली आहे.
भारताच्या ३६.२ षटकात एक बाद २७० धावा झाल्या आहेत. मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरताना दिसत असून, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी घाम गाळावा लागत आहे.  ६५ धावांवर सलामीवीर रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. २५ चेंडूत ४१ धावा फटकावणा-या रोहितने रिचर्डसनच्या गोलंदाजीवर वाडेकडे झेल दिला. त्यानंतर धवन आणि विराटने डाव सावरला.
भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४९  धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सलामीवीर एरॉन फिंच (१०७) शतकी खेळी आणि डेव्हीड वॉर्नरच्या (९३) धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली.  दोघांनी पहिल्या विकेटसाठी १८७ धावांची भागादारी केली.
वॉर्नरला इशंताने तर, फिंचला उमेश यादवने इशांतकरवी झेलबाद केले. हाणामारीच्या षटकात मॅक्सवेलने २० चेंडूत (४१) आणि कर्णधार स्मिथनेही २९ चेंडूत (५१) धावा तडकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ३५० पर्यंत पोहोचता आले. पहिल्या तीन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाज झगडताना दिसले. 
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखणे त्यांना जमले नाही.  मार्शने (३३) , बेलीने (१०) धावा केल्या. हाणामारीच्या षटकात फॉकनर आणि वाडे भोपळाही न फोडता तंबूत परतले. इशांत शर्माने सर्वाधिक चार गडी बाद केले असले तरी त्यासाठी त्याने १० षटकात ७७ धावा मोजल्या. उमेश यादवे १० षटकात ६७ धावा देत तीन गडी बाद केले.