सिल्हेट (वृत्तसंस्था) : सभ्भीनेनी मेघनाचे अर्धशतक आणि शफाली वर्माच्या ४६ धावा या सलामीवीरांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने मलेशियावर मात करत महिला आशिया चषक स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. पावसामुळे डकवर्थ लुईस मेथडने सामन्याचा निर्णय देण्यात आला.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या मलेशियाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या ६ धावांत त्यांचे २ फलंदाज तंबूत परतले होते. दीप्ती शर्माने पहिल्याच षटकात भारताला बळी मिळवून दिला. त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मलेशियाला दुसरा धक्का दिला. त्यामुळे अवघ्या ६ धावांत त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. सहाव्या षटकात पावसाने हजेरी लावली. त्यावेळी मलेशियाच्या धावफलकावर १६ धावा जमल्या होत्या आणि त्यांचे २ फलंदाज माघारी परतले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे मॅच रेफ्री यांनी डकवर्थ लुईस मेथडने भारताला ३० धावांनी विजयी घोषीत केले. त्यामुळे भारताने सलग दुसरा सामना जिंकत स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.