छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला लातूर येथे सुरुवात

0
8

लातूर, दि.16: छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते ध्वज फडकवून आणि क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे उपाध्यक्ष आमदार अमित देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, राज्य हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे, सचिव संजय नाईक, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष मोईज शेख, सचिव दत्ता सोमवंशी, विभागीय क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे,  शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राजस्थानातील कोटा शहराप्रमाणे लातूर हे शिक्षणासाठीचे प्रसिद्ध हब झाले आहे. आता विविध खेळात प्रविण्य मिळवून लातूर जिल्ह्याचे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करूया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे क्रीडाप्रकार आणि खेळाडूंना प्रोत्साहन देतात. त्यामुळे येत्या काळात खेळातही आपण उत्कृष्ट कामगिरी करूया, असा विश्वास खासदार श्री. शृंगारे यांनी व्यक्त केला.

लातूर जिल्ह्यातील खेळासाठी, क्रीडापटूंसाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही देऊन या स्पर्धेसाठी लातूरमध्ये आलेल्या खेळाडूंचे त्यांनी स्वागत केले. लातूरमध्ये आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. लातूर हे खेळासाठी अत्यंत अनुकूल असा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले. लातूर जिल्ह्यात व्हॉलीबॉल तर अगदी खेड्यापाड्यात प्रसिद्ध असा खेळ आहे, असे सांगून यासाठी राज्याची व्हॉलीबॉल प्रबोधिनी लातूरमध्ये व्हावी, अशी मागणी या स्पर्धेच्या आयोजन समितीचे उपाध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केली.

देशात खेलो इंडियासारख्या स्पर्धामुळे खेळाला अतिशय पोषक वातावरण तयार झाले असून आता तालुका पातळीपर्यंत क्रीडा संकुल होत आहेत. यापुढे अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन करावे. त्यातून जिल्ह्यातील विद्यार्थी खेळाकडे आकर्षित होतील, असे प्रतिपादन आमदार श्री. पवार यांनी केले. तसेच या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाची संधी लातूरला दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांचे आभारही मानले.

या स्पर्धेमध्ये राज्यातील आठ विभागाच्या २१ व १८ वर्षांखालील मुला-मुलींचे एकूण ३२ संघातील ४४८  खेळाडू, व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक सहभागी झाले आहेत. तसेच जवळपास दीडशे तांत्रिक समिती सदस्य, अधिकारी, पदाधिकारी व स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

क्रीडा विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक केले. गालिब शेख यांनी सूत्रसंचालन केले, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव दत्ता सोमवंशी यांनी आभार मानले.

रोमहर्षक खेळाने जिंकली प्रेक्षकांची मने

उद्घाटन समारंभानंतर विविध खेळाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात महाराष्ट्राचा पारंपारिक मल्लखांब या खेळातील चित्तथरारक प्रात्यक्षिक मुले आणि मुलींनी दाखविली. देशीकेंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी काठी लोकनृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली.