वर्धा नदीत बोट उलटून ११ बुडाले…३ मृतदेह मिळाले; ८ बेपत्ता

0
131

अमरावती– जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यापैकी ३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. इतरांचा शोध सुरु आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नावाडी वगळता नावेत बसणारे इतर सर्व एकमेकांचे नातेवाईक होते. ते लागतच्या गाडेगाव येथील मटरे कुटुंबियांकडे दशक्रियेच्या कायक्रमासाठी आले होते.
प्राप्त माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते. अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. बुडणाऱ्यांमध्ये  नारायण मटरे( वय ४५), अश्विनी खंडाळे (वय २५), वृषाली वाघमारे (वय १९), अतुल वाघमारे (वय २५), वांशिका शिवणकर (वय २), निशा मटरे (वय २२) ,किरण खंडाळे (वय २८), अदिती खंडाळे (वय १३) , मोहिनी खंडाळे (वय ११), पियुष मटरे (वय ८), पूनम शिवणकर (वय २६) असल्याचे पुढे आले आहे. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप तिघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांनीच शोध कार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलिस घटनास्थळी पोहचले, आमदार देवेंद्र भुयार , उपविभागीय अधिकारी, तहसीलदार घटनास्थळावर असून शोधकार्य सुरू आहे.