शिवसेना व वंचित बहुजन आघाडी एकत्र: पत्रकार परिषदेत घोषणा मुंबईला

0
14

मुंबई-शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाईसह आदी नेते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

हुकुमशाहीविरोधात एकत्र

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि भाजपवर घणाघाती हल्ले केले. उद्धव ठाकरे म्हणाले, देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या देशात प्रचंड वैचारिक प्रदूषण सुरू आहे. हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येईल.तर, प्रकाश आंबेडकर यांनीही एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल, असे म्हटले आहे.

आज एका स्वप्नाची पूर्ती झाली

युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आतादेखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसरार एकत्र आले आहेत.

वंचितचा अद्याप मविआत समावेश नाही

वंचित बहूजन आघाडी आणि शिवसेनेने आज युती केली असती तरी वंचितचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमचा विरोध केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमचे पूर्वी चांगले सख्य होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणार नाही, असा विश्वास वाटतो.

पवारांकडे पाहत राहिलो अन् माझ्याच लोकांनी दगा दिला

शरद पवारांसोबत माझे पूर्वी चांगलेल सख्य होते, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी दिला. त्याचा दाखला देत मी तर शरद पवारांकडेच बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी मला दिगा दिला, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर चांगलाच हशा पिकला. वंचितच्या मविआतील समावेशाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी आणि भाजपविरोधात, हुकुमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वंचितला विरोध करतील असे वाटत नाही. लवकरच दोन्ही पक्षांची चर्चा करुन याबाबत भूमिका स्पष्ट करू. तसेच, वंचितसोबत व इतर मित्र पक्षांसोबत जागावाटप कसे होईल, याबाबत विचार करुनच वंचितसोबत युती केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

यालाच लोकशाही म्हणायचे का?

मोदी सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या देशात न्यायालये, तपास यंत्रणा सर्वांवरच दबाव आहे. नुकतेच कायदामंत्री किरण रिजीजू म्हणाले की, न्यायालयांमध्येही लोकप्रतिनिधींनी नियुक्त केलेले न्यायाधीश असावेत. केंद्रीय कायदामंत्र्यांचे हे वक्तव्य संविधानाला अनुसुरुन आहे का? यालाच लोकशाही म्हणायचे का?तर, प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरएसएस आणि नरेंद्र मोदी देशात जातीवादी राजकारण करत आहेत. 2002 ची एक बीबीसीची डॉक्युमेंट्रीही नरेंद्र मोदींना आता सहन होत नाही. या माहितीपटावर बंदी घातली जात आहे. ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. मात्र, मोदींचे नेतृत्वही एक दिवस संपुष्टात येईल.

शिवसेनेचे हिंदुत्व मान्य- प्रकाश आंबेडकर

शिवसेनेचे प्रबोधनकार ठाकरेंचे हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, प्रबोधनकारांनी समाज व्यवस्थेत सुधारणा व्हावी, या दृष्टीकोनातून हिंदुत्वाची मांडणी केली. सर्व समाजाला एकत्र आणणारे त्यांचे हिंदुत्व होते. हे हिंदुत्व आम्हाला मान्य आहे.

भाजपची बाहेरख्याली

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने तर जम्मू-काश्मिरात पीडीपी पक्षासोबत युती केली. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आरएसएस संपवण्याची भाषा केली होती, त्या नितीश कुमारांसोबत भाजपने युती केली. म्हणजे भाजपने बाहेरख्याली केली तरी चालते आणि आम्ही वटपौर्णिमा जरी साजरी केली, तरी यांचा आक्षेप, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.