फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर पत्रकार वारीसे यांची हत्या;ठाकरे गटाचा गंभीर आरोप

0
15

मुंबई :-रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथल्या प्रस्तावित रिफयनरीला विरोध करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीसे यांचं हत्या प्रकरण सरकारला अडचणीचं ठरणार आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळं वारीसे यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.याप्रकरणी बोलताना संजय राऊत म्हणाले, “स्थानिकांचा या रिफायनरीला विरोध आहे. त्यामुळं शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे. पण जेव्हापासून राज्यातील सरकार बदललं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री लोकांना वारंवार धमकावत आहेत की कोणत्याही परिस्थित आम्ही रिफायनरी इथं घेऊन येणारचं. जर याला विरोध कराल तर तो विरोध आम्ही मोडून काढू. अशा प्रकारच्या धमक्या जर सरकारकडून दिल्या जात असतील तर त्या ठिकाणचे जे गुंड आहेत त्यांना बळ मिळेल”

“15 दिवसांपूर्वी त्याठिकाणी अंगणेवाडी इथं एक देवीची यात्रा पार पडली. मुंबईहून हजारो लोक या यात्रेला जातात. या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत विधान केलं की, रिफायनरी आम्ही घेऊन येऊ कोण रोखतंय ते पाहू. त्यांच्या या विधानानंतर २४ दिवसांनी रिफायनरीला विरोध करणारा युवा पत्रकार शशीकांत वारीसे यांची निर्घृण हत्या झाली. या अर्थ काय आहे? हा केवळ एक योगायोग नाहीए. या हस्तेमागं मोठा कट आहे, मी काय बोलतोय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलच माहिती आहे. आजवर कोकणात २५ वर्षात जेवढ्या राजकीय हत्या झाल्या आहेत त्यात या घटनेचाही समावेश आहे,” असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला आहे.

“मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान ऐकलंय, त्यांनी म्हटलंय की, “या प्रकरणातील आरोपींना आम्ही सोडणार नाही” पण तुम्ही त्यांना सोडलं आहे. शिवसेना या पत्रकाराचं बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही. कोकणाच्या भूमीत लोकमान्य टिळकांसारख्या पत्रकारांची मोठी परंपरा आहे, तिथं ही घटना घडते हे निषेधार्ह आहे. यामध्ये श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर या यादीत आता शशीकांत वारीसे यांचं नाव समाविष्ट झालं आहे. वारीसे प्रकरणाची देशभरात चर्चा आहे, त्यामुळं केंद्र सरकारनं याची दखल घ्यावी.

दडपण आणत सर्वांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय

या हत्या प्रकरणी पोलिसांवर दबाव आहे. रिफायनरीचे जे विरोधक आहेत त्यात राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, स्वयंसेवी संस्था असतील या सर्वांवर दडपण आणा त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवा असे आदेश पोलिसांनी देण्यात आले आहेत. या प्रकरणातील ही पहिली हत्या असून इतरांनाही याची भीती आहे.