मंत्रिमंडळ बैठक निर्णय :धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार

0
43

मुंबई,दि.14ः- राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मांडण्यात आला. राज्य हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल हा प्रस्ताव मांडण्यात आला. यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 1 हजार कोटी निधीस मान्यता देण्यात आली असून, या निर्णयाचा 5 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

मंत्रिमंडळाचे निर्णय असे

– राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार.(शालेय शिक्षण विभाग)

– धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. १ हजार कोटी निधीस मान्यता. ५ लाख शेतकऱ्यांना लाभ. (अन्न व नागरी पुरवठा विभाग)

– डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

– महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत. (सार्वजनिक आरोग्य विभाग)

– पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. (जलसंपदा विभाग)

– पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण. छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा. जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाखाचा विकास आराखडा. सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखडा.