>मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. आता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे मराठवाड्यातील आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी पत्रकारपरिषद घेत स्पष्टीकरण दिले. मी आज काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा आमदाराशी बोललेलो नाही. कोण काय करेल, ते मला माहिती नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काँग्रेसच्या एकाही आमदाराशी माझे बोलणे झालेले नाही, असे चव्हाण यांनी म्हटले.
यावेळी अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्यामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली. प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे, असे काही नाही. मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. आता मला वाटते की, मी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता मी विचार करुन पुढची दिशा ठरवेन. मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच मला कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची वाच्यता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले.