नक्षलवाद्यांकडून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन

0
8
file photo

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र असून पत्रक काढून त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. देशात नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयामुळे सामान्य जनता हैराण आहे. दहा वर्षांत आठ लाख लघुद्योग बंद पडले. त्यामुळे दोन कोटी लोकांचा रोजगार हिरावला. सध्या महिन्याला १३ लाख बेरोजगारांची भर पडत आहे, तर दर दिवशी ३० शेतकरी बेरोजगारी- कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणालाच समर्थन देऊ नका, मतदानावर बहिष्कार घाला, असा फतवा नक्षलवाद्यांनी काढला आहे. नक्षलवाद्यांनी १३ एप्रिलला जारी केलेल्या पत्रकातून भाजपसह सर्वच पक्षांना लक्ष्य केले आहे.

भारत कम्युनिष्ट पार्टी (माओवादी ) दक्षिण सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता समता याने हे पत्रक जारी केले आहे. त्यात १९ व्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या उदात्तीकरण व जागतिकीकरण धोरणामुळे देशावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. जागतिकीकरणाच्या माध्यमातून धनदांडग्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. छत्तीसगडचे हसदेव जंगल अदानी ग्रुपच्या स्वाधीन केले. ३३ टक्के वनक्षेत्र हवे, पण देशात सध्या हे क्षेत्र २१ टक्केच उरले आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सरकार सत्तारुढ होताच कॉर्पोरेट क्षेत्राच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची गरज आहे. या निवडणुकीवर बहिष्कार टाका व नवजनवादी राज्य निर्माणात साथ द्या, असे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे.

अयोध्या, काशी, द्वारका, मथूरा, उज्जैन, कांशीपुरम ही महत्त्वाची देवस्थाने ‘टुरीझम सेंटर’च्या नावाखाली कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा घाट घातला जात आहे. १५ वर्षांपर्यंत कॉर्पोरेट कंपन्यांकडून कुठलाही कर आकारू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कॅम्प उघडले जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.