मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आज(दि.9) संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे सुपूर्द केला आहे. गेल्या दीड वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु असलेला पाहायला मिळत होता. गेल्या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल जनतेची माफी मागितली होती. ते म्हणाले होते की, हे संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. गेल्या वर्षी 3 मे पासून आजपर्यंत जे काही घडले त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो. राज्यातील अनेकांनी आपल्या कुटुंबियांना आणि आप्तस्वकियांना गमावले आहे. राज्यातील अनेक लोकांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यात शांततापूर्ण वातावरण आहे. मला आशा आहे की, 2025 मध्ये राज्याची स्थिती पूर्ववत होईल.
मणिपूरच्या राजकारणात उलथा-पालथा
दरम्यान, एकीकडे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवलेला असतानाच दुसरीकडे मणिपूरच्या राजकारणात उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मणिपूरच्या राजकारणात केंद्र सरकार आणि खासकरुन मोदी आणि शाहांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. मणिपूरमध्ये कायदा आणि सुवस्थेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारामुळे 250 जणांचा मृत्यू
मणिपूरमध्ये 2023 पासून जातीय हिंसाचार सुरु आहे. राज्य दोन हिस्स्यांमध्ये वाटल्या गेल्याची चर्चा आहे. डोंगरी भागात कुकी या समुदायाचं वर्चस्व आहे. आरक्षण आणि अनुदानाच्या मुद्द्यावरुन मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार झाला होता. यामध्ये 250 लोकांना जीव गमवावा लागला होता, तर 60 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल होता.