परभणी : न्यायालयीन कोठडीत मयत झालेले सोमनाथ सुर्यवंशी, कालवश विजय वाकोडे यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी परभणीतून निघालेला लाँगमार्च नाशिकजवळ पोहोचला आहे. याच दरम्यान परभणी पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार अशा एकूण चार जणांना निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींचे पथक आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले असून त्यांची समजूत काढण्यात येत आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार नवा मोंढा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तुरनर, पोलीस अंमलदार सतीश दैठणकर, मोहित पठाण, राजेश जटाळ यांना निलंबीत करण्यात आले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर परभणी शहरात बंद पुकारण्यात आला.
या दरम्यान जाळपोळ, दगडफेकीची घटना घडली. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. याच दरम्यान लोकनेते विजय वाकोडे हे देखील मयत झाले. अती ताणामुळे त्यांचा मृत्यू झाला. मयताच्या कुटूंबीयांना न्याय द्यावा यासाठी परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आंदोलनकर्त्यांनी न्यायासाठी परभणी ते मुंबई असा लाँगमार्च काढला. सध्या हा लाँगमार्च नाशिक जवळ आहे.
याच दरम्यान आता एक पोलिस उप निरीक्षक व तिन पोलीस अंमलदारांना शासकीय सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. लाँग मार्चमध्ये सहभागी आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्यासाठी पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींचे पथक आंदोलनकर्त्यांजवळ पोहोचले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सदर प्रकरणात या अगोदर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे निलंबीत आहेत.