वैनगंगा नदीच्या पात्रात तीन बहिणी बुडाल्या;वर्धा नदीत तीन युवकांचा बुडून मृत्यू

0
167

चंद्रपूर :गडचिरोली – चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथे वैनगंगा नदीच्या पात्रात चंद्रपुरातील कु. प्रतिमा प्रकाश मंडल (२३), कु. कविता प्रकाश मंडल (२१), कु. लिपिका प्रकाश मंडल (१८) या तीन बहिणी बुडल्याने खळबळ उडाली आहे. या तिन्ही बहिणींचा युध्दपातळीवर शोध घेतला जात आहे. एकूण पाच जण बुडाले होते. त्यापैकी दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे तर तिघींचा शोध सुरू आहे. सदर घटना ही दुपारच्या सुमाराची आहे.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रहिवासी असलेले मंडल कुटूंबिय महाशिवरात्री निमित्त मार्कंडा येथे जाण्यासाठी निघाले होते.मात्र चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाखाली आंघोळीसाठी उतरले असता खोल पाण्यात गेल्याने कु.लिपिका मंडल, कु.प्रतिमा मंडल व कु.कविता मंडल या वैनगंगेच्या पाण्यात बुडाल्या.
राजुरा तालुक्यापासून जवळ असलेल्या चुनाळा येथील घराजवळील नागरिकांसोबत महाशिवरात्रीच्या पर्वावर वर्धा नदी येथे आंघोळ करण्यासाठी गेलेल्या तुषार शालिक आत्राम (१७) मंगेश बंडू चणकापुरे (२०) अनिकेत शंकर कोडापे (१८) वरील सर्व राहणार चुनाळा यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार (दि. २६) दुपारी १ वाजता घडली आहे.

महाशिवरात्री निमित्त चुनाळा येथील काही नागरिक चुनाळा येथील वर्धा नदी घाटावर आंघोळ करण्यासाठी जात असता त्यांच्यासोबत घराजवळील तुषार आत्राम, मंगेश चणकापुरे, अनिकेत कोडापे हे तिन्ही युवक आंघोळ करण्यासाठी गेले नदीपात्रात महिला एका बाजूला आंघोळ करीत असताना महिलापासून दूर काही अंतरावर जाऊन तिन्ही युवक आंघोळ करीत होते.घटनास्थळी राजुराचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, बल्लारपूर पोलिस स्टेशनची टीम, राजुराचे नायब तहसीलदार किशोर तेलंग, आपत्ती व्यवस्थापन चंद्रपुरची टीम, चुनाळा ग्राम पंचायत सरपंच बाळनाथ वडस्कर, पोलिस पाटील निमकर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते