तलावात बुडून चार मुलांचा मृत्यू

0
9
मंगरुळपीर, दि. 09 – शहरालगत वाशिम रस्त्यावर असलेल्या चमेली तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मंगरुळपीर शहरालगत असलल्या अशोक नगर भागातील रहिवासी बालके रोशन भगत (९), जिवन भगत (१०), रोहण अडाखे (११)  व आशुतोष बेलखेडे (१५) हे चौघेही वाशिम रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतशिवारातील चमेली तलावाकडे बक-या चारण्याकरिता गेले होते. बक-या चारतांना तलावात पोहण्याबाबत विचार करुन ते तलावात उतरले. यांच्यासोबत अधिक एक मुलगा असल्याची चर्चा घटनास्थळी होती. हे चौधेही तलावात पोहत असतांना बुडत असल्याचे सोबत असलेल्या मुलाला कळाल्याने त्याने घरी येवून सांगितले. मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारावर परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. तलावात मुलांचा शोध घेण्यात आला तेव्हा चारही जणांचे मृतदेह आढळून आलेत. सदर बाब उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार के.बी. सुरडकर, ठाणेदार रमेश जायभये यांना कळल्याबरोबर घटनास्थळी भेट दिली. तलावातून मुलांचे मृतदेह काढण्यासाठी शेख हसन, शेख उस्मान, सैय्यद नासिर सैय्यद जब्बार, संदिप हरिहर, सागर मानेकर, मुकेश पठाळे, संतोष गावंडे, गणेश काळे इत्यादींनी सहकार्य केले.  मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढल्याबरोबर नातेवाईकांचा घटनास्थळावर एकच आक्रोश होता. सोबत असलेला पाचवा मुलगा कोण होता याबाबत पोलीस विभाग व परिसरातील नागरिक चुप्पी साधून आहेत