जितेंद्र आव्हाडांसह 19 आमदार 9 महिन्यांसाठी निलंबित

0
21

मुंबई,दि.22: अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 10 आमदारांचा समावेश आहे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, काँग्रेसचे अब्दुल्ल सत्तार यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश आहे. या सर्वांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात यावं, असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला. तो मान्य करण्यात आला.त्यामुळे आता या आमदारांना पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनाला हजर राहता येणार नाही.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता.सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून या आमदारांचं निलंबन करण्यात आले आहे.

हे आमदार निलंबित

काँग्रेसचे निलंबित आमदार

अमर काळे – काँग्रेस, आर्वी मतदारसंघ, वर्धा
विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर
हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा
अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद
डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर
संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे
अमित झनक – काँग्रेस, रिसोड, वाशिम
कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण
जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार

भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी
जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे
मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी
संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर
अवधूत तटकरे – राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड
दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा
नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी, नाशिक
वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर
राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर
दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे